Tuesday, July 1, 2025

नमस्कार

भारतीय संस्कृती ही नम्रतेची आणि कृतज्ञतेची शिकवण देणारी आहे. त्या संस्कृतीत नमस्कार हे केवळ एक अभिवादन नसून, तो एक संस्कार आहे. नमस्कारातून व्यक्तीची वृत्ती, तिची विनम्रता आणि संस्कार दिसून येतात. पूर्वीच्या काळात घराघरात साष्टांग नमस्कार, रामराम, प्रणाम करणे ही गोष्ट रोजच्या जीवनाचा भाग होती.

शास्त्रानुसार नमस्काराचे तीन प्रकार सांगितले गेले आहेत –

1. कायिक नमस्कार (शारीरिक – साष्टांग/अष्टांग नमस्कार),


2. वाचिक नमस्कार (म्हणून केलेला – "हरि ऊँ", "रामराम"),


3. मानसिक नमस्कार (मनात देवाचे स्मरण करणे).



या तिन्ही प्रकारांमध्ये साष्टांग नमस्कार सर्वोच्च मानला जातो. यामध्ये शरीराची आठ अंगे (डोकं, हात, हृदय, गुडघे, पाय) जमिनीला टेकतात. हा नमस्कार केवळ श्रद्धेचा नव्हे, तर उत्तम व्यायामाचाही एक प्रकार आहे.

मात्र, स्त्रियांनी हा साष्टांग नमस्कार करू नये, असे शास्त्र सांगते. यामागचं कारण हे गर्भधारणेचा आणि मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी आहे. स्त्रीचा गर्भ आणि वक्ष जमिनीला टेकू नयेत, कारण त्या दोन्ही अंगांत जीवननिर्मिती आणि पालन यांचे सामर्थ्य असते – जसे भूमीत असते. म्हणून स्त्रियांना गुडघ्यावर बसून, डोकं टेकवून नमस्कार करण्याचा सल्ला दिला जातो.

आजच्या यांत्रिक जीवनशैलीत नमस्कार ही संस्कृती लोप पावत आहे. पण आपण ती जपायला हवी. लाज न बाळगता, रोज कायिक, वाचिक, किंवा मानसिक नमस्कार करत पुढच्या पिढीलाही हा संस्कार द्यावा.

No comments:

Post a Comment